Friday, 14 October 2011

मोडी शिकवणी आणि आम्ही.......

भाद्रपद कृ. ७ शके १९३३ (म्हणजे १९ सप्टेंबर, २०११) आम्ही मोडी शिकावयास प्रारंभ केला आणि अश्विन शु. १२ शके १९३३ (म्हणजे ८ ऑक्टोबर, २०११) या दिवशी आमची शिकवणी पूर्ण झाली प्रतिदिन सायंकाळी सूर्यास्तानंतर एक घटका समय सोडून (म्हणजे ६.३० वाजता) आमची शिकवणी सुरु व्हायची. शिकवणीचे स्थळ होते, "भारत इतिहास संशोधक मंडळ, सदाशिव पेठ, पुणे" आणि मास्तर होते श्री.मंदार लवाटे (सुप्रसिद्ध इतिहास संशोधक) बास.यापेक्षा जास्त मी प्राकृत मराठी बोलायचा किंवा लिहिण्याचा प्रयत्न नाही करू शकत.!!!

पण एक गोष्ट मात्र नक्की कि, आम्ही शाळा सोडल्यापासून (किंवा शाळेने आम्हाला सोडल्यापासून) फक्त दोनच मास्तर असे लाभले कि ज्यांच्या तासाला कधीच कंटाळा आला नाही आणि एक दिवस जरी चुकून तास बुडाला तरी मनाला रुखरुख लागून रहायची. त्यातले पहिले होते डॉ.विजय गोखले आणि दुसरे श्री.मंदार लवाटे.
संगणक आणि इतिहास हे माझे आवडीचे विषय आणि या दोन्ही मास्तरांनी त्या दोन्ही विषयांच्या माझ्या आवडीला पुरेपूर खतपाणी घातलं. मोडीचा क्लास सुरु होताना, मोडी म्हणजे ऐतिहासिक काळात पत्रव्यवहार करण्याची लिपी यापलीकडे तिच्याविषयी काहीच ठाऊक नव्हत आणि इतिहासाचा अभ्यासही महाराज, संभाजी महाराज आणि पेशवे यांच्यावर प्रकाशीत झालेलं ललितसाहित्य आणि इतर काही इतिहासकालीन संदर्भ ग्रंथ याच्या पलीकडे गेलेलं नव्हत. पण जसजशी शिकवणी पुढे जात राहिली तशा अनेक ऐतिहासिक गोष्टी किंवा गमतीजमती म्हणू हव तर, या समजायला लागल्या.




इ.स.वी सनाच्या १२व्या शतकात हेमाड पंथाकडून हि लिपी विकसित जाहली असा एक समज आहे. म्हणजे जवळ जवळ ९०० वर्षे हि लिपी अस्तित्वात आहे. महाराजांची, पेशव्यांची जवळ जवळ बरीच पत्रे हि मोडीत आहेत. पेशवे दप्तर म्हणून पुण्याच्या कौन्सिल हॉल ला एक संस्था आहे. तिथे ४ कोटी कागद (पत्रे) आहेत. इतिहास संशोधक पत्रांना कागद अस म्हणतात आणि अशा काही पत्रांना एकत्र बांधल्यावर त्याचा रुमाल होतो.

ढोबळमानाने मोडीचे ४ प्रकार होतात. १) शिवपुर्वकालीन मोडी (२) शिवकालीन मोडी (३) पेशवेकालीन मोडी (४) इंग्रजकालीन मोडी
यातल्या पहिल्या ३ प्रकारांना बोरुची मोडी अस म्हणतात आणि शेवटल्या प्रकाराला टाकाची मोडी असे म्हणतात. यातील बोरुची मोडी हि वाचण्यास सोपी पण शब्द लागण्यास कठीण कारण त्यावेळची बोलीभाषाहि आजच्यापेक्षा जरा निराळी होती. टाकाची मोडी हि वाचावयास क्लिष्ट पण शब्द लागण्यास सोपी आहे, कारण हिची भाषा हि बरीचशी अलीकडच्या काळातली पण टाक वापरला असल्याने अक्षरांचा आकार [फोंट] छोटा होत जातो..मोडीच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तीत कसलेही विरामचिन्हे नाहीत. त्यामुळे जरी तुम्हाला अक्षरओळख झाली तरी शब्द लागण हे कठीण असतं आणि ते कौशल्य फक्त सरावातूनच येत.

पत्र आणि तारखा यांचा परस्परांशी शंकर-नंदी किंवा गणपती-उंदीर यांच्यासारखा संबंध आहे. महादेव आहेत आणि नंदी नाही हे जस होत नाही
तसच पत्र आहे पण तारीख नाही अस होत नाही. या तारखांचीसुद्धा गम्मत आहे.
पूर्वी पत्रांवर फारसी किंवा मुसलमानी तारखा असायच्या. त्यांचे सुहुरसन, फसलीसन आणि हिजरीसन असे सन आहेत.
या प्रत्येक सनात अनुक्रमे ६००, ५९०, ६२२ वर्षे मिळवली तर तो इ.स.वी सन होतो.
आणि जर इ.स.वी सनातून ७८ वर्षे वगळली तर तो शालिवाहन शक होतो. तसेच फारसीमध्ये आकड्यांनाहि नावे वेगळी आहेत.
उदा. शून्य म्हणजे सुफ्र, एक म्हणजे इहीदे, चार म्हणजे अर्बा, दहा म्हणजे अशर, पन्नास म्हणजे खमसेन, शंभर म्हणजे मया आणि हजार म्हणजे अलफ इत्यादी.
आता हि तारीख बघा. सु || अर्बा खमसेन मया अलफ
यातील "सु ||" म्हणजे सुहुरसन : अर्बा म्हणजे ४ : खमसेन म्हणजे ५० : मया म्हणजे १०० : अलफ म्हणजे १०००
आता या सर्व आकड्यांची बेरीज ४+५०+१००+१००० = ११५४ येते. थोडक्यात हे सुहुरसनाच ११५४वे वर्ष आहे...
आणि यात जर आपण ६०० मिळवले तर ११५४ + ६०० = इ.स.वी सन १७५४ मिळते.....
आणि यातून जर आपण ७८ वगळले तर १७५४-७८ = शालिवाहन शक १६७६ मिळते.

फारसीतल्या महिन्यांची नावेही वेगळी आहेत. मोहरम, सफर, रबिलाबल, रबिलाखल, जमादिलावल, जमादिलाखर, रजब, साबान, रमजान, सवाल, जिल्काद, जिल्हेज हे ते बारा महिने होत. त्यामुळे "छ.१० मोहरम" याचा अर्थ मोहरम महिन्यातला १०वा चंद्र [किंवा दिवस] असा होतो. चंद्राचा उल्लेख आलाय कारण त्यांच्याकडे दिवसाचे मोजमाप संध्याकाळी चालू होत असे.

आपल्या राजाचा मोठेपणा कुठे आहे तर महाराजांनी मराठी महिने, तारखा आणि राज्याभिषेक शक वापरायला सुरुवात केली पण तरीही ते गेल्यावर पुढे परत फारसी तारखाच बघायला मिळतात ज्याची कारणे हि बरीचशी राजकीय आहेत. ६जुन १६७४ ते ६ जून १६७५ हा राज्याभिषेक शक १ होतो आणि सध्याचं वर्ष म्हणजे २०११-१२ हे राज्याभिषेक शक ३३८ आहे.

शिवाजी महाराजांचे तीर्थरूप श्री शहाजी महाराज यांच्याकडे शिवरायांच्या जन्माच्यावेळेस ६२००० गावांची जहागिरी होती आणि आदिलशाही दरबारी त्यांच वजन हे वजीरापेक्षाहि मोठ होत ज्याच कारण त्यांचा रणांगणावरचा अतुलनीय पराक्रम व त्याहूनही थोर अशी त्यांची राजकीय मुत्सद्देगिरी. पण यामागे सांगण्याचा उद्देश इतकाच आहे कि एवढा पराक्रमी व थोर पिता लाभला असतानाही शिवाजी महाराजांनी स्वराज्याच स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात उतरवलं.

परंतु फारसी भाषा हि काही ठिकाणी फारच नाजूक आहे. "साली आधी घरवाली" अशी एक म्हण आहे. बायको आणि मेव्हणी यांना फारसी नावे पहिली तर हे १००% पटत.बायकोला फारसीत "शरीत-ए-हयात" म्हणतात तर मेव्हणीला फारसीत "हमजुल्फ" असा शब्द आहे. नवर्याला "खाविंद" म्हणतात आणि लेखक या शब्दाला तर अतिशय सुंदर असा "साहिब-ए-कलम" शब्द आहे. या फारसीच्या लिपीस नास्तालिक असे म्हणतात. आपल्या मराठीची जी लिपी आहे तिला पूर्वी बाळबोध असे म्हणायचे (सध्या देवनागरी म्हणतात.)

शिवपूर्वकाल, शिवकाल, पेशवेकाल या सर्वांवर फारसीचा एक ठळक असा छाप आढळून येतो. किल्ला, रुमाल, जमीन, कागद, कारखाना, अंबरखाना, फर्जंद या आणि अशा कितीतरी फारसी, उर्दू शब्दांचा मराठीवर आघात झालेला दिसतो. आणि म्हणून राज्याभिषेकप्रसंगी महाराजांनी रघुनाथ पंडित व धुंडिराज लक्ष्मण व्यास यांना बोलावून घेतले व म्हटले कि "आपली भाषा यावनी भाषेमुळे लुप्त जाहली आहे. तरी तुम्ही या फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत प्रतिशब्द काढा" आणि मग "राज्यव्यवहार कोश" नावाचा ग्रंथ तयार झाला. असा कोश तयार करणारे छत्रपती महाराज हा पहिला राजा आहे. या ग्रंथात किल्याला ला दुर्ग; कारखान्याला संभारगृह; अंबरखान्याला धान्यकोश असे अनेक शब्द दिले आहेत.
पण दुर्दैव हे कि महाराज गेल्यावर हळूहळू परत हे भाषेवरील आक्रमण सुरु झाले आणि आता तर मराठी हि भाषा उर्दू, फारसी, हिंदी आणि मुख्यतः इंग्रजी इतक्या भाषांनी बाटलेली आहे. आजही आपल्याकडे अनेक संस्कृत पोथ्या ज्यात वैद्यकशास्त्र, खगोलशास्त्र, गणित, युद्धशास्त्र, आणि अशाच कितीतरी विद्यांच ज्ञान जे कदाचित जगाला तारू शकेल ते धूळ खात पडून आहे. का? तर वाचणार कुणी नाहीये.

पूर्वीचे वजनाचे हिशेब हे ज्या मापांमध्ये होत त्याबद्दलही बरीच माहिती समजली.
एक शेर म्हणजे ०.९६ ग्रॅम. ४ शेरांची १ पायली. १६ पायालींचा १ एक मण आणि २० मण मिळून १ खंडी होत असे. म्हणजेच छत्रपतींच जे सिंहासन होत ते ३२ मण सुवर्णाच म्हणजे जवळ जवळ १९३-१९५ तोळे सोन्याने बनविलेले होत. हे फक्त मी सोन्याच सांगतोय. आणखी हिरे, माणके, पाचू यांची मोजदाद वेगळीच.
अशीच मोजमापे अंतर व चलन मोजायची सुद्धा आहेत.
१ तसू म्हणजे करंगळी ते तर्जनी एवढ अंतर :: २४ तसू म्हणजे १ गज :: १ काठी म्हणजे ५ हात अंतर :: १ बिघा म्हणजे ४०० चौरस काठ्या :: १ पाड म्हणजे २० काठ्या :: १ चावर म्हणजे १० बिघे किंवा २४ रुके :: १ सजगणी म्हणजे ६ रुके.
३ पैचा एक पैसा :: ४ पैशांचा एक आणा :: १६ आण्याचा १ रुपया.
हि सगळी परिमाणे आपण अजूनही वापरू शकतो पण आपले विचार, आचार किंबहुना संपूर्ण जीवनच हे अनेक प्रमाणात इंग्रजाळलेल आहे. इंग्रजांच्या दुरदृष्टीच एक उदाहरण देतो. इ.स.वी सन १६७५ साली जेव्हा शिवाजी महाराज छत्रपती होते तेव्हाच इंग्लंड मध्ये जवळ जवळ ७० वर्तमानपत्रे होती.

इतिहासातील अनेक समज-गैरसमज सुद्धा या क्लासच्या निमित्ताने कळाले. त्यातलं पहिलं म्हणजे शनिवारवाडा ते पर्वती असल कुठलही भुयार नाही.
पुणेकर पाणी खूप वापरतात हा सध्याच्या राज्यकर्त्यांचा एक आरोप आहे ज्यावरून एक आठवल कि कात्रजवरून जे पाणी पुण्यात आणलं गेल त्यामुळे पुण्याच्या मध्यवर्ती भागातल्या अनेक हौदांमध्ये वाहून जाईपर्यंत पाणी असायचं आणि पूर्वीच्या काळी त्या हौदांवर सार्वजनिक स्नानगृहे होती...
पुण्याचे उल्लेख हे थेट ६व्या शतकातल्या ताम्रपटात सापडले आहेत आणि पुण्यातली जी कसबा पेठ आहे ती जवळ जवळ १५०० ते २००० वर्षे जुनी असावी असा अंदाज आहे.

असेच एकदा शिकवत असताना सरांनी एक हास्यास्पद गोष्ट सांगितली. "मोडी अभ्यासक्रमात ठेवावी कि नाही" यासाठी १९५१ साली सरकारने १२ जणांची एक समिती बनविली. त्यात ११ मराठी आणि १ इंग्रज होता..सरकारने तेव्हापासून मोडी अभ्यासक्रमातून काढून टाकली कारण शेवटच्या मतदानात ११ विरुद्ध १ अस चित्र होत. यातले ११ जण [जे मराठी होते] ते म्हणत होते कि मोडी नको आणि १ जण [जो इंग्रज होता] तो म्हणत होत कि मोडी ठेवा म्हणून. कारण ती तुमची संस्कृती आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या परंपरांची आणि संस्कृतीची होळी कशी होत गेली याच हे एक उत्तम उदाहरण आहे.

मध्यंतरी काही वर्षांपूर्वी फ्रेंच सरकारने अस जाहीर केल कि, फ्रेंच राज्यक्रांती व त्याबाबत असलेला असा एकही कागद आमच्याकडे उरला नाहीये जो आम्ही वाचला नाही आणि आपल्याकडे असे करोडो कागद आहेत जे अजूनही आमच्या वैभवशाली इतिहासाची व विश्वपराक्रमी पूर्वजांची अनेक रहस्ये आपल्या पोटात घेऊन पडून आहेत आणि त्यांच दुर्दैव अस कि ते वाचण्यासाठी आवश्यक असणार मनुष्यबळ उपलब्ध असूनही "इतिहासाविषयी उदासीनता" या एकमेव अवगुणामुळे आम्ही खूप मागे पडत चाललो आहोत.
पण एक मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे जे राष्ट्र आपल्या परंपरांची, संस्कृतीची नाळ तोडून फक्त इतरांच अंधानुकरण करण्यात धन्यता मानते, आधुनिकतेच्या नावाखाली खोट्या प्रगतीचे बुरखे पांघरून ज्ञान, विज्ञान, शास्त्र या बाबतीत महासत्तेचे तळवे चाटत बसते, त्याच वर्तमान तर भरकटतच पण भविष्यसुद्धा अंधकारमय होत जात..आणि याच उत्तम उदाहरण म्हणजे आपला धुमसता शेजार आहे.

असो. हा न संपणारा विषय आहे..पण आज जेव्हा जेव्हा मी एखादी विस्मयकारक ऐतिहासिक घटना वाचतो किंवा ऐकतो तेव्हा हे कळून चुकत कि आपण फक्त उदासीनतेमुळे म्हणा किंवा बेजबाबदार वृत्तीने म्हणा एका खूप महान व दैदिप्यमान अश्या ज्ञानसंग्रहाला काळाच्या पडद्याआड ढकलत चाललो आहोत. पण कधीतरी आपल्याला समज येईल असे वाटते आणि उमेद कायम राहते. आणि ते म्हणतात ना, "उम्मीद पे तो दुनिया कायम है"..मग माझी एवढी छोटीशी इच्छा जिवंत राहायला काय हरकत आहे?




--
-- आपला,
|| श्रीशिवछत्रपती चरणी तत्पर, सारंग भोईरकर ||

Friday, 23 September 2011

नावाशी थोडा विसंगत असलेला --- तुंग उर्फ कठीणगड

तुंग उर्फ कठीणगड....पुण्याच्या वायव्येस सुमारे ७५ कि.मीवर असलेला एक देखणा पण नावाशी जरा विसंगत असलेला गड.
नावाशी विसंगत कारण हा चढाई करायला अजिबात अवघड नाही. हो पण भासवतो मात्र तसा.
तुंग खरतर तीकोन्याप्रमाणेच घाटरक्षक. स्वराज्याच्या अनेक दुर्गद्वयींपैकी एक. याचा सुळका किंवा सुळक्यासारखा आकार असलेला माथा अतिशय आकर्षक. म्हणजे हे त्यांच्यासाठी नाहीये ज्यांना, संदीप खरेच्या भाषेत सांगायचं झाल तर, "डोंगर बघता उंची नाही खोली आठवते".
खर सांगू तर हे गड, त्यांचे सुळके, ताशीव कडे, माच्या, बुरुज, तटबंदया, दरवाजे, भक्कम पायर्र्या, जोती हे खरे पुरुषार्थाचे प्रतिक वाटतात.
खुणावत असतात ते आपल्याला. म्हणत असतात कि "या रे पोरांनो, मनसोक्त बागडा माझ्या अंगाखांद्यावर. अरे तुमच्या पूर्वजांनी याच माझ्या छातीवर आणि खांद्यावर उभे राहून स्वराज्य उभ केलं.मी तुमचा आहे आणि तुम्ही माझे आहात." हे आणि अस बरच काही. असो थोडासा भरकटलो मी.!!

शनिवार २० ऑगस्टला सकाळी ७.३० ला निघालो. मी, अतुल तळाशीकर, नचिकेत कुलकर्णी आणि मंगेश मगर असे चौघे होतो. पाऊस नव्हता. बरंचस आभाळ साफ होत.
मधून मधून सूर्य डोकावून जात होता. तुंगचा रस्ता हाही तीकोन्यासारखाच. पुणे -- चांदणी चौक -- पौड -- हाडशी -- कोळवण -- जवण -- शिळीम -- तुंगवाडी.
आधी गाडीत आणि मग पोटात इंधन टाकून पौडवरून उजवीकडे वळालो. आणि हाडशी, कोळवण गावे पार करीत जवण फाट्याला आलो. इथे एक खूप छान दृश्य दिसतं.


जवण फाट्यापासून आपण उजव्या हाताला पाहिलं तर भला मोठा तिकोना त्याच्या डोंगरधारांसकट पसरलेला दिसतो. आणि डाव्या हाताला दूरवर तुंगचा सुळका खुणावत असतो.


इथून डाव्या हाताला वळालो आणि तीकोन्याला पाठीशी ठेवून आम्ही तुंगकडे जायला लागलो. जवणफाट्यापासून तुंग हा बरोबर २७ कि.मी राहतो.
इथून पुढचा हा २७ कि.मीचा रस्ता भारतातील खेडी, त्यांतील रस्ते आणि त्यांचा सामान्यांना होणारा त्रास या तिन्ही गोष्टींवर चर्चा करण्यासाठी भरपूर मुद्दे पुरवणारा होता.
इतका कुरूप रस्ता मी पाहिला नव्हता. आजूबाजूला जर निसर्ग सौंदर्य नसत तर मात्र आणखी बाजार उठला असता. रस्ता मधेच फाटलेला होता, खड्डे तर असंख्य. त्याला पक्का म्हणावे तर बरीच माती आणि कच्चा म्हणावे तर मधेच डांबर दिसायचे.पण हे असलं तरी निसर्गाने नेसलेली हिरवाई मात्र यात मोहून टाकते. त्यातच मध्ये मध्ये होणारं पवना धरणाच दर्शन हे हि सुखद.




लांबून पाहिलं तर तुंग हा एका भिंतीसारखा दिसतो.पण हि भिंत कशी तर एकावरएक ४ पायर्या असलेली.
याची सर्वात डावीकडची पायरी म्हणजे त्याचा दक्षिणेकडचा बुरुज आणि सर्वात शेवटची पायरी म्हणजे तो उत्तरेकडचा माथा किंवा सुळका. पण या पायर्यांचे एकमेकातल अंतर मात्र बरेच मोठे. मजल दरमजल करीत तुंगवाडीत पोहोचलो.
हे गाव फार मोठ नाही. म्हणजे अजिबातच मोठ नाही.गावाच्या आणि गडाच्या मधून एक रस्ता जातो जो उत्तरेकडे थेट पवना धरणात उतरतो.


तुंग हा दक्षिणोत्तर पसरलेला गड. याचा मुख्य दरवाजा हा उत्तरेकडे तोंड करून असलेला. या गडाच एक वैशिष्ट्य म्हणा किंवा एक सांगण्यासारखी बाब म्हणजे या दरवाज्याचे बुरुज आपल्याला पायाथ्यापासुनही दिसतात.





गडाच्या पायथ्याशीच एक मारूतीच मंदिर आहे. त्याच्या शेजारूनच गडाची पायवाट चालू होते. हि संपूर्ण वाट गड किंवा तटबंदी डाव्या हाताला ठेऊन वर जाते जे शिवदुर्गांच एक वैशिष्ट्य.
पायवाटेवर सुरुवातीलाच काही पायर्या आहेत. आत्ताच बांधलेल्या आहेत त्या. त्या संपल्या कि शिवकालीन काही पायर्या मध्ये मध्ये लागतात. वाट अवघड नाही पण मध्ये मध्ये पायर्या अरुंद आहेत. पाण्याचे छोटे ओहोळ खाली येत होते म्हणून जपून चालव लागत होत. एक दोन खेकडेहि दिसले. थोड वर चढून आल कि डाव्या हाताला जी पायर्यांची भिंत आहे तिथे एक भिंतीतच एक कोनाडा आहे त्यात एक मारुती आहे. त्याच नाव-गाव काही माहित नाही पण त्याच वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या कंबरेत एक चाकू किंवा खंजीर आहे. मी तरी आजवर गदा सोडून कुठलंच शस्त्र मारुतीकडे पाहिलेले नाही.




इथूनच आपण उजव्या हाताला पाहिलं कि विस्तीर्ण पसरलेलं पवना खोर आणि पवना धरणाच अतिशय विहंगम असं दर्शन होत. चढाईचा पूर्ण थकवा इथेच निघून जातो. या गडाची आणखी एक सांगण्यासारखी बाब म्हणजे याच्या डोंगरावर आणि डोंगरउतारावर पसरलेली रानकेळींची बने. "बने" हा शब्द मी मुद्दाम वापरला कारण त्यावरून तुम्ही कल्पना करू शकाल कि त्यांची मोजदाद ठेवण शक्यच नाही. आत्ता त्या सर्व झाडांना अगदी छोटी छोटी केळी लागली होती.आणि "टेबल लाम्प" सारख दिसणार केळफूल मात्र प्रत्येक झाडावर दिसत होत.


माथ्याजवळ आल्यावर मात्र आपण एक डावीकडे वळण घेतो आणि तटबंदी उजवी ठेऊन थोड चालल्यावर आपण पहिल्या दरवाज्यात येतो. पायथ्यापासून हे अंतर कापायला ४५ मिनिटे खूप होतात. इथे आम्ही पैसा किड्याची जोडी पहिली. दरवाजा फार तर १५ फुटी असावा. अडसराची भोके आणि बिजागार्यांचे होल्डर्स अजूनही तसेच.







इथून थोड चढून गेल्यावर दोन बुरुज लागतात. मुख्य दरवाज्याचे संरक्षक बुरुज आहेत ते. उंची २५-३० फुट आहे. इथून डाव वळण घेऊन आपण दरवाज्यात येतो. हि बांधणी गोमुखी आहे. दरवाज्याच्या समोर जो बुरुजाचा भाग येतो त्यावर त्या बुरुजाचा संरक्षक मारुती आहे. अजूनही त्याचा शेंदूर नीट आहे. या दरवाज्याला लागूनच दोन्ही बाजूला पहारेकर्यांच्या देवड्या आहेत. या अशा देवड्या बर्याच कमी ठिकाणी पाहायला मिळतात.




आणखी ३-४ पायर्या चढून गेलो कि आपण एका पठारावर येतो. इथून थोड्पुढे चालत गेल कि उत्तरेचा छोटा बुरुज लागतो. हा बुरुज म्हणजे मघाशी मी जी पायर्या असलेली भिंत म्हणालो त्याची सर्वात खालची पायरी आहे. आणि आपण ज्या पठारावर येतो ती दुसरी पायरी ठरते.
या बुरुजाच्या बरोबर विरुद्ध बाजूला म्हणजे दक्षिणेकडे तुंगचा तो सुळका किंवा माथा आहे. त्याच्या वाटेवर प्रथम एक कातळ कोरीव पाण्याच टाक आहे आणि त्या टाक्याच्या काठीच अतिशय जीर्ण असं गणपतीच मंदिर. बाप्पांची मूर्ती बैठ्या स्वरुपाची आहे.



याच्या शेजारून माथ्याकडे जायला लागलो कि थोड चढून आपण परत एका पठारावर येतो. हि त्या भिंतीची तिसरी पायरी म्हणजे हे पठार. इथे एका विशिष्ट प्रकारची झुडूप दिसली. त्यांच्या पानांमुळे ते एकसंध वाटतात.


इथून आपण एका चिंचोळ्या वाटेने ५ मिनिटात गडाच्या सर्वोच्च माथ्यावर येऊन पोहोचतो. हीच ती चौथी पायरी. याचा विस्तार फार मोठा नाही.
याच्या दक्षिणेच्या टोकावर कसलातरी शेंदरी देव आहे. कदाचित म्हसोबा किंवा भैरोबा असेल आणि उत्तरेकडे झेंडाकाठी. इथे आम्ही एक मस्त घोषणा दिली.




इथून समोरच काहीसा आग्नेयेकडे पण बराचसा दक्षिणेकडे वसलेला तिकोना दिसतो. तसेच पश्चिमेला लोहगड आणि ईशान्येस विसापूर हि दुर्गजोडी दिसते.इथून जर आपण पूर्वेला नीट पाहिलं तर दोन डोंगरांमधून काहीस अस्पष्ट असं मुळशी धरणाच पाणी दिसत. इथून आपण नीट पाहिलं तर उत्तर सोडून बाकी तीनही दिशांना पवनेच पाणी दिसत. आणि त्याचबरोबर जागोजागी निसर्गाची कूस फाडून त्याच्यात धनदांड्ग्यांनी आणि राजकारण्यांनी उभरलेले आपले बंगलेही दिसतात.



आता सगळा गड पाहून झाला होता. गणपतीच्या देवळापाशी येऊन आरती केली. पठारावर बसून थोड खाऊन घेतलं आणि उतरायला लागलो. येताना वाटेत तो खंजीर मारुती पुन्हा दिसतो. शनिवार होता. खड्या आवाजात चौघांनी मारुतिस्तोत्र म्हटलं आणि पायथ्याला आलो.
गाड्या काढल्या आणि तुंगचा निरोप घेतला. तसा छोटासाच पण स्वराज्याच्या अगदी मोक्याच्या जागी वसलेला हा गड मनातही एक मस्त घर करून बसतो आणि सर्वात महत्वाच मनात राहत ते त्याच्यावरून दिसणार पवनेच पाणी.

--
-- आपला,
|| श्रीशिवछत्रपती चरणी तत्पर, सारंग भोईरकर ||

Monday, 15 August 2011

बिकट वाट वहिवाट असावी....!!!

"बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्ग सोडू नको,
संसारामध्ये ऐस आपुला उगाच भटकत फिरू नको."

अनंत फंदींचा फटका आठवतोय. इतक्या साध्या शब्दांमध्ये त्यांनी आयुष्य कस जगावं हे सांगितलय.पण कधी कधी आयुष्याची वहिवाट थोडीशी बिकट करावीशी वाटते किंवा ती नकळत बिकट होते, थोडा त्रास होतो तीवरून चालताना पण इष्टस्थळी पोहोचल्यावर आपण जे केलय ते मागे वळून पाहिलं कि एकदम मस्त वाटत. तसंच काहीस झाल तीकोन्याला..

तिकोना उर्फ वितंडगड. कामशेतपासून आत पवनानगर, काळे कॉलनी भागाकडे एक रस्ता जातो. वाकड पासून सुमारे ३०-३५ कि.मी कामशेत आणि तिथून आत २०-२५ कि.मी वर "पेठ तिकोना" हे पायथ्याच गाव. औंध पासून एकूण अंतर ५७ कि.मी. घरातून निघायला तसा उशीरच झाला. ९ वाजले होते. बरोबर आशिषहि होता.NH - 4 वरून वाकड - चिंचवड - तळेगाव - कामशेत असं करत पायथा गाठला. जाताना रस्त्यात (हायवेवर) ४ कुत्री मागे लागली. या असल्या बेवारशी मित्रांची थोडी भीती वाटते मला.

पेठ तिकोना हे तस छोटस गाव. ग्राममंदिराच्या इथे गाडी लावली. तिथून पुढच गडाच्या पायवाटेपर्यंतच अंतर हे चालत जाव लागत.
ते १-२ कि.मी असेल. पण जिथून हि वाट चालू होते. तिथपासून फक्त चिखल होता. संपूर्ण चिखल. काही ठिकाणी तर पाय घोट्यापर्यंत चिखलात रुतत होते.चालण तर सोडाच साध उभ राहणहि जिकिरीच झाल होत. म्हणून मधेच एक short cut घेतला आणि "बिकट वाटेला" लागलो.


पण त्याआधी तुम्हाला एकंदरीत तीकोन्याची बहिर्र्चना सांगतो. याचा डोंगर हा जरा त्रिकोणी आकाराचा आहे म्हणून नाव तिकोना. आणि जो गड वसवला त्याचे नाव वितंडगड. याची खासियत म्हणजे याच्या "डोंगरधारा". डोंगरधारा म्हणजे डोंगराच्या माथ्यापासून थोड खाली एक उतरण चालू होते ती थेट पायथ्यापर्यंत. अशा ३ डोंगरधारा या डोंगरास आहेत.





एक म्हणजे पूर्वेकडची. दुसरी पश्चिमेला आणि तिसरी उत्तरेला. यात पूर्वेकडे जी धार आहे ती थेट तीकोनापेठेत येते. थोडक्यात तीकोनापेठ हे गडाच्या पूर्व - पायथ्याला असलेल गाव. इथून आपण चालायला सुरुवात करतो आणि हि पूर्व-डोंगरधार जी आहे तिला उजव्या हाताला ठेऊन मळलेली पायवाट धरायला पश्चिम-डोंगर्धारेपर्यंत चालत जातो. हीच ती वाट जी १-२ कि.मी ची असेल,
जी आत्ता संपूर्ण चिखलमय होती. आणि ती टाळावी म्हणून मी ज्या पूर्व-धरेला उजवी ठेऊन चालत होतो तिच्यावर जाण्याचा निर्णय घेऊन जंगलात घुसलो. पूर्व-धारेच्या माथ्यावर जायला आम्हाला जंगलातून जावं लागणार होत. तिथेही काही ठिकाणी चिखल होताच. आता संपूर्ण जंगलात असल्यामुळे धारेचा माथाहि दिसत नव्हता. पण तसच चालत राहिलो. आणि एका पठारासारख्या सपाट जागेवर येऊन पोहोचलो. तिथून धार दिसत होती पण वाट स्पष्ट नव्हती. तिथेच काही बैल चारत होते. म्हटलं बघू आवाज देऊन यांचा मालक वगैरे असेल. आवाज दिला आणि एक आजोबा काठी टेकत आले. त्यांनी वाट दाखवली.
त्यासाठी परत जंगलात शिरलो. थोड चाललो आणि आमच्या पासून एक १०-२० फुटांवर एक झाडातून अचानक एक पक्षी आपले भले मोठे पंख फडफडवीत दुसरीकडे उडून गेला. त्याचा तो आकार पाहून २ मिनिटे पुढे जावं कि नको अशा मनस्थितीत तिथेच थांबलो. कदाचित तो बहिरी ससाणा असावा कारण गरुड शक्य नाही आणि घार व घुबड यांचे पंख इतके मोठे नसतात. त्या शांततेला चिरत जाणारा तो त्याच्या पंखांचा आवाज अजूनही
स्पष्ट आठवतोय. मग तसेच पुढे गेलो आणि एका वळणावर थोडी चढण पार करून एकदाचे त्या धारेवर आलो आणि तिच्यावरून चालायला सुरुवात केली. तिथून उजव्या हाताला खाली पवना धरणाचा विस्तीर्ण जलाशय दिसतो.



ज्यावरून आम्ही चाललो होतो तीसुद्धा एक मळलेली पायवाटच होती. जिथे हि डोंगरधार डोंगराला मिळते तिथून एक मस्त वाट चालू झाली. आपल्या दोन पावलांना जितकी जागा लागते तितकीच जागा होती. उजव्या हाताला डोंगर आणि डावीकडे थेट उतार आणि दोन्ही बाजूला उगवलेलं गवत. ते तर आमच्याहि डोक्यावरून आणखी ३-४ फुट गेलेलं. वाट प्रचंड घसरडी होती. त्यात मधेच पाण्याचे ओहोळ लागायचे. तिथून जपून जावं लागत होत. मधेच एखादी चढण किंवा उतरण लागायची. एक वळसा घेऊन आता आम्ही तटबंदीच्या खाली पोहोचलो. तिथून पायर्या दिसत होत्या. पण या पायर्या वेगळ्याच होत्या. एकतर पायरीच्या ज्या भागावर आपण उभे राहतो तिथे फक्त अर्ध पाऊल मावेल एवढी जागा होती आणि पायरीची उंची मात्र जवळजवळ ३-४ फुट होती. त्यात त्यांच्यावर शेवाळ माजलेल. वरून पाणी येत होत. त्यातल्या त्यात एकच बर होत कि, खाचा नीट सापडत होत्या त्यामुळे आधार मिळत होता. त्यांचाच आधार घेत घेत वर पोहोचलो आणि एका दरवाजापाशी येऊन थांबलो. हाच गडाचा महादरवाजा. पण याची उंची मात्र फार नाही. १५ फुट वगैरे असावी. पण याच्या माथ्यावरही दोन्ही बाजूस ती नेहमीचीच फुलांची नक्षी आणि आतल्या बाजूस अडसाराची भोकं आणि बिजागार्यांचे होल्डर्स. तिथून आत गेलो. परत एक छोटी चढण आणि डावीकडच्या रस्त्यावरून जात असताना आणखी एक दरवाजा लागला. याचे नाव पालथा दरवाजा. तिथून थोड पुढे चालत गेलो कि हि वाट संपते आणि आपण एका सपाट जागेवर येतो. इथून वर बालेकिल्ल्यास जायला रस्ता आहे. पण या सपाट भागात डोंगरात खोदलेली एक दक्षिणाभिमुख लेणी आहे. जिच्यात एक तळजाईच मंदिर आणि त्या शेजारीच एक गुहा. राहयला हि जागा उत्तम आहे.



तिच्या समोर एक सुंदर तळ आणि शेजारी कातळकोरीव पाण्याच टाक आहे. तिथे सध्या एक नाथपंथीय साधू राहतात. आम्ही गेलो तेव्हा ते चुलीवर चपात्या करत बसले होते. अशा लोकांशी बोलताना थोडी भीतीच वाटते आधी कारण ती बरीच मुडी असतात. त्यांना आधी नमस्कार केला. मग ते जरा खुलले आणि आमची विचारपूस केली. मी त्यांची विचारपूस करणार होतो पण संन्याशाच कुळ आणि मुळ विचारू नये त्यामुळे देवीच दर्शन घेतलं. या गाभार्यात मधोमध माथ्यावर कोरलेलं एक सुंदर कमळ आहे.



इथून थोड पुढे गेल कि एक चुन्याचा घाणा लागतो. तो शिवकालीन आहे. त्याची जाती बघूनच हे पटत कि हे फक्त बैलच ओढू शकतात. घाण्याच्या पुढेच काही अंतरावर बालेकिल्ल्याच्या पायर्या चालू होतात. तश्या त्या साध्याच आहेत पण या संपूर्ण जिन्याचा जमिनीशी झालेला कोन हा नक्कीच ७०- ८० अंशातला असावा.कारण तिव्र चढण म्हणजे काय हे या पायर्यांकडे पाहून कळत.



आणि म्हणूनच हा जिना चढण्यासाठी आधार म्हणून दुर्गसंवर्धन समितीने दोन्ही बाजूस जाड वायर्स लावल्या आहेत.३५-४० पायर्या चढून गेल्यावर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो. दोन बुरुजांच्या मधोमध बांधलेला सुबक दरवाजा.






याचे होल्डर्स गायब आहेत. इथून आत गेलो कि उजव्या हाताला लगेच एक टाक आणि राहण्याची जागा..पण पावसाळ्यात मात्र नाही राहता येणार. थोड पाणी गळत होत. दरवाज्याच्या समोरच एक जिना आहे जिथून बालेकिल्ल्याच्या सर्वात सर्वोच्च भागावर पोहोचता येत. तिथे गेल्या-गेल्या समोरच एक महादेवच मंदिर. आत्ता काही वर्षांपूर्वीच जीर्णोद्धार झालेलं. आत एक शिवलिंग आणि बाहेर नंदी. याच्या मागेच एक छोटीशी उंच जागा आणि त्यापलीकडे बुरुज. बस संपला बालेकिल्ला. पण यावरून उत्तरेस लोहगड-विसापूर दिसतात. याच्या पूर्वेस मावळ आणि पश्चिमेस कोरबारसे पेटा आहे. आणि सर्वात सुंदर म्हणजे थोडस ईशान्येस दिसणारा आणि तिन्ही बाजूंनी धरणाच्या पाण्याने वेढलेला तुंग उर्फ कठीणगडही दिसतो. पण पाऊस आणि धुक्यामुळे आम्हाला यातलं काही दिसलं नाही.

तसा तीकोन्याचा विस्तार हा फार मोठा नाही. लेणी, पाण्याची टाकी, मंदिर आणि दारूकोठाराचे अवशेष सोडता बाकी काही दिसत नाही. हा किल्ला महाराजांनी इ.स १६५७ च्या आसपास स्वराज्यात सामील करून घेतला. पेण वरून घाटमाथा चढून येणारे घाट नजरेखाली ठेवण्यासाठी याचा मुख्य उपयोग व्हायचा. पुढे मोगल सरदार अमानुल्लाखानाने १७०२ मध्य हा गड जिंकून घेतला आणि औरंगजेबाकडे निशाण म्हणून सोन्याच्या चाव्या पाठवल्या. पुढे २० फेब्रुवारी १७०७ ला औरंगजेब मेल्यानंतर मराठ्यांनी हा गड परत स्वराज्यात सामील करून घेतला.

मंदिराच्या मागे जिथे झेंडाकाठीची जागा आहे तिथे एक ग्रुप होता. त्यांना एकत्र करून एक मस्त घोषणा दिली. त्यांना खूपच आवडली. मला भेळ आणि बर्फी खायला दिली. ते एक बर झाल. नाही नाही म्हणत मी हि जरा घेतली कारण भूक लागलीच होती. चौकशी केल्यावर समजल कि तो पूर्ण ग्रुप coep चा होता. त्यांच्या बरोबर त्यांचे सर होते. S .E Mech चा होता. त्या सरांनी मला विचारलं "काय करतोस?". मी म्हटलं, "मी पण इंजीनिअरच आहे. फक्त वाया गेलेला.." त्यांचा निरोप घेऊन निघालो. त्यानंतर मग मंदिरात गेलो. अभिषेकपात्र भरलं. आरती केली. आणि बाहेर आलो.







आता काही फार बघण्यासारख नव्हतंच.म्हणून परत निघालो. दरवाज्यात येऊन परत एक घोषणा दिली. जाताना मात्र आम्ही तो महादरवाज्याचा अवघड रस्ता टाळला आणि त्याच्या विरुद्ध बाजूने म्हणजेच पश्चिमेच्या धारेकडे निघालो. इथून जाताना लेणीच्या पुढेच एक मारुती आहे. चपेटदान मारुती. जवळजवळ १५ फुट उंच आणि तितक्याच रुंद अशा दगडात असलेला हा शेंदरी मारुती चपात मारण्याच्या आवेशात हात उगारून उभा आहे. त्याच्या डाव्या पायाखाली एक राक्षसीण आहे जिचे नाव "पनवती". तिथेच बाजूला २-३ बाटल्यांमध्ये तेल होत. बहुतेक गावातल्या लोकांनी ठेवलं असाव. थोड-थोड तेल घातलं मारुतीला. मारुतिस्तोत्र म्हटलं एकदम खड्या आवाजात आणि निघालो.



धारेवर पोहोचायला २ दरवाजे लागतात.



ते पार केले कि धार आणि थेट खाली ती चिखलयुक्त पायवाट. तिच्यावरून चालण्यावाचून गत्यंतर नव्हत. ती तुडवत तुडवत गाडीपाशी आलो.






एव्हाना मोजे हे ४-५ तासांपूर्वी पांढरे होते यावर कुणाचाच विश्वास बसला नसता. आणि बुटांचा रंग हा अनेकविध झाला होता. गावांत कुठे नळ दिसला नाही, म्हणजे मीच फार थांबून बघितलं नाही. ज्या रस्त्याने आलो होतो त्याच्या बिलकुल विरुद्ध दिशेने पिरंगुट मार्गे जाणार होतो. मुख्य स्त्याला लागलो आणि लगेच एक मस्त ओढा दिसला. थांबून आधी मोजे काढले. ते फेकून दिले. बूट आणि पाय धुतले आणि वाटेला लागलो. इथून पुढचा रस्ता म्हणजे "हिरवे हिरवे गार गालिचे....." असा होता.




मावळ आणि मुळशीच्या सीमेवरून भातशेतीच्या मधोमध हा रस्ता जातो. अशी सुंदर निसर्गाची चित्रकला डोळ्यांचे पारणे फिटवतो. ती हिरवी, काहीशी पिवळी असलेली भातशेती. गुडघाभर चिखलात काम करत असलेले ते काटक शेतमजूर. हाडशी, कोळवण, भालगुडी अशी गावे आणि मग पौड. तिथून डावीकडे थेट पिरंगुट.
मध्ये पिरंगुटच्या इथे एक श्रीपाद नावाचं हॉटेल आहे. कधी गेलात तर नक्की थांबा आणि तिथली मिसळ आणि भजी नक्की ट्राय करा. तिथून निघालो. भूकुम - भूगाव - चांदणी चौक - बावधन - पाषाण - औंध या मार्गाने घरी.
थोडक्यात सांगू का ? तुमच्या कडे अर्धा दिवस मोकळा असेल. फार ट्रेकिंगची सवय नसेल पण गड तर पाहायचा असेल तर तिकोन्यासारखा गड नाही.
हो पण मी गेलो त्या मधल्या वाटेने जाणार असाल गडावर, तर मात्र जरा पावसाला संपू द्या. मी काय केल ते घरगुती भाषेत सांगू का ? सरळसोट वहिवाट सोडून मधली वाट घेतली म्हणजे कस?, घरी भात-वरण आहे. पण त्यातच जरा मजा आणावी म्हणून आपण वरणाला फोडणी देतो..पापड तळतो किंवा भाजतो.चटणी-लोणचहि घेतो. तेवढीच जरा मजा...!!!
मग तुम्हीही करा ट्राय एखाद्या विकेंडला. ट्रेकही होतो. भातशेतीही बघता येते. आणि हो मावळ तालुक्याला एक प्रदक्षिणाहि होते...!!!

Saturday, 9 July 2011

"कुणा एकट्याचीच ट्रेकिंगकथा"

स्थळ :- कॅफे paradise
तारीख, वार :- २ जुलै २०११, शनिवार
वेळ :- संध्याकाळी ६:३०
पात्रसंख्या :- ३
पात्रनावे :- अतुल तळाशीकर, नचिकेत कुलकर्णी, सारंग भोईरकर.

"मग उद्या जायचं ना कोरीगडला?"--सारंग
"अरे,उद्या घरी थांबायचं आहे.घरच्यांबरोबर बाहेर जावे लागेल"--अतुल
थोडा नाराज झालो मी,पण अतुलच म्हणण पटण्यासारख होत कारण गेल्याच विकेंडला राजगड केला होता आम्ही.
मग तोच प्रश्न मी नच्याला विचारला,म्हटलं हा नक्की येईल कारण तो राजगडला नव्हता. पण त्याने जे कारण दिल ते "आवरा" वर टाकण्याच्या लायकीच होत.
"माझ्या मावसबहिणीला नोकरी लागली आहे. सो, ती उद्या मला खायला घालणार आहे"--वदले कुलकर्णी
आणि तो "खायला घालणार आहे" असच म्हणाला बर का.!! नाहीतर तुम्हाला वाटेल मी अतिशयोक्ती करतोय.पार्टी देतीये, ट्रीट देतीये वगैरे काही नाही. "खायला घालणार आहे" संपला विषय. पण दोष त्याचा नाहीये .एकतर तो नारायण पेठेत राहतो.आणि दुसर अस कि तो नु.म.वि त शिकलाय.असो.
सलग दोन नकार (ट्रेकिंगचे) पचवून बाहेर पडलो. जिमला गेलो. तिथून संदीपला फोन केला. म्हटलं बघुयात हा तरी येऊ शकेन का? पण तो पुरंधरला जाणार होता.त्याच्या नकारानंतर मात्र उद्याच्या ट्रेकच्या कल्पनेची पूर्णपणे नसबंदी झाल्यासारख वाटल. पण तरीही कोरीगड मनातून जातच नव्हता आणि आता कुणालाही विचारण्यात रस उरला नव्हता.
जिम वरून घरी जातानाही गाडीवर तोच विचार आणि मग कस कुणास ठाऊक पण अचानक विचार आला मनात. कि एकट जायचं. नेहमी जातोच कि मित्रांबरोबर. उद्या एकटच जाऊयात.आणि तसही कोरीगड म्हणजे काय हरिश्चंद्र नाहीये कि कुणीतरी पाहिजेच बरोबर. सकाळी जाऊन संध्याकाळी परत.
त्या मनस्थितीतच घरी आलो. घरी फार काही बोललो नाही. लोणावळ्याला चाललोय एवढंच सांगितलं. नशीब "चौकशी समिती" बसली नाही. पण तरीही मासाहेबांनी कटकट केलीच. पण त्याचीही गरज आहेच कारण तिची चिडचिड झाल्याशिवाय माझा एकही ट्रेक पूर्ण होत नाही. (किंवा ती होऊ देत नाही.) एकूण एकच.
रविवारी सकाळी उठायलाच ७.३० वाजले. म्हटलं आता बोंबलतय जाण आपल. उशीर झाला. घाईघाईत आवरलं. आणि आहे तशीच sack घेऊन बाहेर पडलो. गाडीत पेट्रोल टाकल आणि वाकड च्या इथून NH-4 वर आलो. थोडा पाऊस भुरभुरत होता. फार गर्दी नव्हती. लोणावळा वगैरे भागाकड "विकेंड एन्जॉय" करायला जाणार पब्लिक दिसत होत. काही दुचाकीवर पण बरचस चारचाकीत. चारचाकीतल पब्लिक कस भुर्रकन निघून जात. पण दुचाकीवरच पब्लिक फार त्रास देत. म्हणजे गाडीवर एक मुलगा किंवा दोन मुलं असली तर आपल्याला कधीच त्रास होत नाही. पण जर एकाच गाडीवर भिन्नलिंगी माणस जर असतील, म्हणजे आपल्या वयाची तर मात्र लयी त्रास होतो. आणि असा त्रास परवा लयी झाला.एकतर "सुहाना सफर और ये मोसम हंसी" असा प्रकार, त्यात "मी यकटाच" आणि "ते दोघे". तिच्या मागे अजून एक माणूस बसवायचाय अशा समजुतीने ती बसलेली. दोघांच्या मधून केवळ मुंगी जाऊ शकेल एवढीच जागा. नाही, बसा हो. बसायला आमची काय हरकत असणारे? गाडी तुमची, पोरगी तुमची, खर्च तुमचा. फक्त आमचा प्रॉब्लेम असा आहे कि देवाने आम्हाला डोळे दिलेत आणि त्यांना असलं "भलत-सलतं" बघायची लयी सवय. आता हे "भलत" आहे कि नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण त्या तसल्या वातावरणात ते "सलतं" मात्र नक्की. असो.
पण जस तळेगाव सोडलं तशी रहदारी जरा विरळ होत गेली आणि मळवली आल्यावर डाव्या हाताला तुंग-तिकोना दिसले. एकदम फ्रेश वाटल. एक-दोन फोटो काढले. परत पुढे जायला लागलो. लोणावळ्यातून भुशी धरणाकडे वळलो. अजून १६ कि.मी. अंतर कापायच होत. १-२ कि.मी पुढे आलो, एक डोंगर ओलांडावा लागतो. छोटासा घाट आहे. त्यात शिरलो आणि ढगात चालणं काय असत याचा स्पष्ट अनुभव आला. मागे २० फुट आणि पुढे २० फुट एवढंच दिसत होत. बाकी संपूर्ण धुक. त्यामुळे सकाळी ९.३० वाजता गाडीचा दिवा लावावा लागला. तो घाट संपल्यावर एक फाटा लागतो. डावीकडचा रस्ता सहारा सिटीत जातो आणि उजवीकडच्या रस्त्याहून ४ कि.मी वर पेठ शहापूर. तिथेच एक केळेवाला उभा होता. त्याच्याकडून दोन केळी घेऊन खाल्ली. शहापूरला पोचेस्तोवर १०.१५ जाहले होते.

कोरीगडाचा आकार हा बराचसा कोयरी सारखा आहे. त्याचाच अपभ्रंश होवून हा कोरीगड झाला असावा आणि या कोयरीचा जो निमुळता भाग आहे त्याच्या पायथ्याला पेठ शहापूर आहे. चालायला सुरुवात केली आणि पहिल्यांदाच प्रत्यय आला तो उजव्या तटबंदीचा. जेव्हा आपण एखादा गड चढायला लागतो तेव्हा तटबंदी बर्याच वेळा उजव्या हाताला राहते. हे शिवदुर्गांच एक वैशिष्ट्य आहे. यामुळे होत असं,जर हल्ला झाला तर तटबंदीवरच्या पहारेकऱ्यांना एकेक माणूस नीट टिपता येतो. कोरीगड हा चढाईच्या दृष्टीने फारच किरकोळ आहे. आधी एक १० मिनिटांच जंगल आणि त्यानंतर ७०० पायर्या. थोड रमतगमत ५० मिनिटांत वर पोहोचलो.


महादरवाजाची बांधणी हि काहीशी गोमुखी थाटाची (शिवदुर्गांच आणखी एक वैशिष्ट्य). दरवाजाच्या बिजागर्यांचे होल्डर्स अजूनही दरवाज्याच्या आकाराची कल्पना देणारे आणि त्याच खालोखाल जमिनीपासून ५ फुटांवर अडसराची भोकं. या दोन गोष्टी आपल्याला अजूनही कुठल्याही गडावर बघायला मिळतील.


१६५७ मध्य हा गड महाराजांनी घेतल्याचे उल्लेख आहेत आणि आज जवळ जवळ ३५४ वर्षांनी सुद्धा त्या तशाच आहेत आणखी १००० वर्षे जगायला. दरवाज्याच्या समोरच असलेला या दरवाज्याचा संरक्षक बुरुज त्याच्यापासुनही ३० फुट उंचीवर आहे.


दरवाज्याच्या दर्शनी भागावर झेंडाकाठीपासून खाली ३ ते ४ फुटांवर, दोन्ही बाजूला एक नक्षी आहे, फुलांची हि नक्षी तुम्हाला जवळजवळ प्रत्येक गडाच्या महादारावाज्यावर दिसेल, बहुधा हिरोजी इटलकरांची ती favorite असावी.


आत गेल्यागेल्या लगेच एक सुंदर तलाव आहे.व्यवस्थित बांधून काढलेला. ज्याची भिंत हि थेट तटबंदीला जाऊन भिडते. आणि हो, महादरवाज्याचा थोड खाली १००-१५० पायर्या राहिलेल्या असतानाच पिण्याच्या पाण्याची सोय आहे. अतिशय निर्मळ पाणी. तलावाच्या काठीच महादेवच मंदिर आहे. छोटं आणि साधं. आत गेलो. अभिषेकपात्र रिकाम होत. तळ्यातून पाणी आणून ते भरलं. आरती करून बाहेर आलो. तटबंदीवर जाऊन उभा राहिलो आणि या गडाच आणखी एक वैशिष्ट्य नजरेत भरलं. ते म्हणजे उत्तर-दक्षिण पसरलेल्या या गडाची तटबंदी अजूनहि पूर्णपणे तशीच आहे.म्हणजे कोयरीच्या निमुळत्या बाजूपासून ते दुसर्या बाजूपर्यंत. आतल्या बाजूने मोजली तर काही ठिकाणी ती ५ ते ६ फुट आहे तर बाहेरील बाजूने डोंगराच्या मुख्य कातळापासून तिची उंची १८ ते २० फुट आहे.



महादरवाज्याचा एक बुरुज सोडला तर आणखी दोन बुरुज दिसतात..एक दक्षिणेला आणि एक उत्तरेला ( शहापूर जवळचा ). तटबंदीवर दर १०० फुटांवर बंदुकीच्या जागा आहेत..या जागांमध्ये काही ठिकाणी तटबंदीतच एक आडोसा तयार करण्यात आला आहे. आणि त्या अडोश्याच्या आत एक माणूस बसू शकेल एवढी जागा आणि एक outlet आहे. बहुधा याचा उपयोग तटबंदीवरच्या पहारेकर्यांकडून शौचकुपासारखा होत असावा. या अशा दोन-तीन जागा आहेत. "संडास" या गोष्टीचाही हिरोजींनी किती बारीक विचार केला होता आणि आज स्वातंत्र्या नंतर ६० वर्षे ओलांडली तरी आम्ही "हागणदारी मुक्त " गावाच्या योजना राबवीत असतो.


उत्तरेचा बुरुज हा आकाराने छोटा आणि त्याच्या खाली लगेच ताशीव कडा. या बुरुजाच्या मागेच १००-१५० मीटरवर डाव्या तटबंदीपासून आत एक खंदक आहे, ज्याच्या आत पाण्याची टाकी आणि छोट्या गुहा आहेत. तसं पाहायला गेल तर गडाच दक्षिणोत्तर अंतर हे २.५-३ कि.मी च्या आसपास, जे इतर गडांच्या तुलनेत फारच लहान. पण तरीही या एवढ्याश्या गडावर पाण्याची फारच मुबलक सोय आहे. पाण्याच महत्व राजांनी किती ओळखल होत हे यावरूनच दिसत. बुरुजावर गेलो तिथे आधीच काही मंडळी होती. त्या सगळ्यांना एकत्र करून एक मस्त घोषणा दिली आणि दक्षिणेच्या बुरुजाकडे निघालो.



जाताना तलाव ओलांडावा लागतो. त्याच्या पलीकडे महादेवच मंदिर आणि त्याच्याच शेजारी थोड वरच्या बाजूला गणपती आणि विष्णूच मंदिर. मी आत जाणार तेवढ्यात बाजूला काहीतरी चमकल. एक रामाचा फोटो होता. व्यवस्थित फ्रेम केलेला. राम, सीता, लक्ष्मण आणि मारुती चौघ आपले निवांत बसले होते. बाजूला दगड आणि धोंडे.


मला त्या फोटोच तिथल प्रयोजनच कळेना. पण म्हटलं जाऊ दे असेल काहीतरी. बूट काढून आत जाणार पण राम काही जाऊ देईना. सरळ खाली गेलो. फोटो उचलला आणि आत घेऊन आलो.आत आधी एक शिवलिंग आहे. त्याच्या मागे विष्णू, गणपती यांच्या दगडी मुर्त्या आणि त्यांच्या शेजारी साईबाबांचा एक फोटो. त्याच्याच शेजारी थोड adjust करून रामभाऊंना बसवलं. अयोध्येत नाही तर नाही निदान इथे तरी रामाला मंदिर देऊ शकलो याच समाधान. गणपतीची आरती केली. अभिषेकपात्र भरलं पाण्याने आणि बाहेर पडलो.


दक्षिणेकडच्या बुरुजाचा विस्तार हा बराच मोठा आहे. या बुरुजाकडे जाताना वाटेत दोन भग्नावशेष दिसले. आकारावरून तरी दारू कोठार आणि किल्लेदाराच्या वाड्याचे वाटतात. या बुरूजाजवळच कोराई माता मंदिर आहे. अगदी प्रशस्त. सभामंडप असलेल. कोराईदेवीची मुर्तीही उभट आणि प्रसन्नवदन असलेली. दर्शन घेऊन आरती केली. मंदिराच्या बाहेरच चौथार्यावर एक सुंदर दीपमाळ आहे.



मंदिराच्या मागे डावीकडे तटबंदीवर एक ९-१० फुट लांब तोफ आहे. पूर्वेकडून तोंड करून राहिलेली. मी तिथे गेलो तेव्हा एक मुलगा त्या तोफेवर आपल्या बापाची जहागीर आहे अशा पद्धतीने झोपून फोटो काढून घेत होता. पराक्रमाच्या व्याख्या प्रत्येकाच्या वेगळ्या असतात हेच खर.असो.


कोराई मंदिराच्या मागे उजवीकडे तटबंदीत काही पायर्या आहेट ज्या थेट दक्षिणेच्या दरवाजात गेलेल्या. हा दरवाजा आंबवणे गावाकडे उघडतो. या दरवाज्याच्या गडाकडील भागात दर्शनी माथ्यावर एक चिन्ह कोरलंय. हे असच चिन्ह बाकीच्या गडांवरहि दिसत.


या दरवाजातून बघितलं तर दक्षिणेच्या बुरुजाचे आणि तटबंदीचे तीन थर एकाखालोखाल दिसतात. हि बांधणी केलीच कशी असेल याच गोष्टीच नवल वाटत. गडाच्या सीमा किती सुरक्षित असाव्यात याच हे एक उत्तम उदाहरण आहे.


या दरवाजाचा संरक्षक बुरुज म्हणजेच तो दक्षिणेचा बुरुज. दरवाज्यातून त्या बुरुजावर जायला एकतर कोराई मंदिराला वळसा घालून जाव लागत किंवा मग एक छोटा rock patch पार करून तटबंदीच्या बाजूने जाव लागत. बुरुजापासून मागे १००-२०० मीटर अंतरावर आणखी एक तोफ आहे. तिचीही लांबी ९-१० फुट असेल. तीच नाव लक्ष्मी तोफ.


या दक्षिणेकडच्या बुरुजाला वर जायला पायर्या आहेत. त्या पायर्यांच्या थोडंच मागे आणखी एक तोफ जमिनीवर पडलेली दिसली. लांबी बाकीच्या दोन तोफांची आहे तितकीच.



या बुरुजावरूनच खाली सहारा सिटी दिसते. उद्योगपतींचे आणि सत्ताधार्यांचे हात निसर्गाभोवती किती घट्ट आवळले आहेत याची कल्पना येते. या बुरुजाच्या मागे जी लक्ष्मी तोफ आहे तिच्या जवळ एक चौकोनी खोलगट बांधकाम आहे. कदाचित तो घोड्यांचा पाणवठा असावा.


कोराईमाता मंदिर आणि बुरुज यांच्यामध्ये एक निसर्गनिर्मित खंदक तयार झाला आहे. तो थेट दरवाजात जाऊन पोहोचतो. त्याच्यामुळे दरवाज्याच्या मागे एक छोटासा पण सुंदर आणि सुबक धबधबा तयार झाला आहे. निसर्गाने सह्याद्रीला सुंदरतेच लेण नेसवताना कुठेही हात आखडता घेतला नाहीये याच प्रत्यंतर पावलोपावली येत राहत.


आता जवळजवळ सगळा गड फिरून झाला होता. तसाच चालत महादरावाज्यात आलो. सहज म्हणून घड्याळ बघितलं तर ३.३० वाजले होते. तिथेच बाजूला एक ग्रुप काहीतरी खात बसला होता. ते पाहिल्यावर लक्षात आल कि अरेच्च्या आपण काहीच खाल्लेलं नाहीये, म्हणजे आपल्याकडे खायला काहीच नाहीये आणि हा पहिला ट्रेक असेल जिथे मी पाण्याची बाटलीही विसरलो होतो. पण गड पाहताना आणि त्याचा अभ्यास करता याची कशाचीच आठवण राहिली नव्हती. एकदा तटबंदीवर चढून परत गड दिसेल तितका पाहून घेतला. महादरवाज्यातून बाहेर पडून गडाला आणि महाद्वाराला मुजरा केला आणि उतरायला लागलो. २० मिनिटात खाली आलो. येताना वाटेत एक "धनाजी जाधव" नामक ठाण्याला राहणाऱ्या मित्राची ओळख झाली. त्याच्या ऐतिहासिक नावामुळे तो चांगलाच लक्षात राहिला.गाडीपाशी आलो. "धनाजीरावांचा आणि कोरीगडाचा" निरोप घेतला आणि पुण्याच्या वाटेला लागलो....

पोटात भूक होती पण एक छोटीशी गोष्ट केल्यामुळे जो आनंद आणि आत्मविश्वास मिळाला होता त्यापुढे तीच काहीच वाटत नव्हत. माणसांच्या जंगलात स्वतःच माणूसपण हरवून जगणाऱ्या आपल्यासारख्यांनी कधीतरी माणूस व्हायला खर्याखुर्या जंगलात जायला हव. स्वतःचेच काही नवीन पैलू शोधायला आणि मुख्य म्हणजे स्वतःची कंपनी एन्जॉय करायला. मी तरी केली ती !! तुम्ही कधी करताय? -:)


--
-- आपला,
|| श्रीशिवछत्रपती चरणी तत्पर, सारंग भोईरकर ||